Friday, 24 August 2018

संत शिरोमणी नामदेव महाराज

                                                 : शिंपी समाजाची माहीती देत आहे आवडल्यास शेअर करा

आजचा शिंपी समाज हा मुळचा क्षत्रिय होता .परंतु परशुरामाने जेंव्हा पृथ्वी निःक्षत्रिय करण्याचा विडा उचलला तेंव्हा काही क्षत्रिय समाजाने आपल्या मुळच्या लढाऊ वृत्तीचा त्याग केला आणि कपडे शिवण्याचा व्यवसाय स्वीकारला . तेंव्हापासून आजतागायत कपडे शिवणे हाच या समाजाचा व्यवसाय आहे. पूर्वजांच्या व्यवसायामुळे हा समाज "शिंपी" म्हणूनच ओळखला जातो. मुख्य म्हणजे आपण शिंपी असल्याचा समाजाला अभिमान आहे .
अगदी कालपरवापर्यंत शिंपी समाजात भावसार शिंपी, अहिर शिंपी , कोकणी शिंपी आणि नामदेव शिंपी असे भेद होते. या पोटजातीत रोटीबेटी व्यवहार व्यर्ज होता.पण आता हे पोटभेद फारच कमी झालेत. इतकेच नव्हे तर शिंपी समाजात विविध पोटभेद ठेवण्यापेक्षा शिंपी समाजात होऊन गेलेले थोर संत नामदेव महाराज यांच्या नावानेच समाज रूढ करायचा असाही प्रवाह एकूणच शिंपी समाजात जोर धरतोय. कारण जरी शिंपी समाजात पोटजाती असल्या तरी या साऱ्या पोटजातींनी नामदेवांना

आपले पेपर नियमित वाचा
शिंपी समाजाने त्यांची फक्त देवघरातच नाही तर मनाच्या गाभाऱ्यात प्रतिष्ठापना केली आहे आणि स्वतःला ' नामदेव शिंपी ' म्हणविण्यात धन्यता मानीत आहे. असा स्वतःला नामदेवांचा वशंज मानणारा हा समाज महाराष्ट्रात कोकण, पुणे, मुंबई,नाशिकमध्ये प्रामुख्याने वसलेला आहे.आज कोकणातले जेवढे नामदेव शिंपी आहेत ते सारे घाटावरून आले आहेत . सातारा ,सांगली, कोल्हापूर हे त्यांची मूळ ठिकाणे . कोकणात हा समाज सुमारे अडीचशे वर्षापूर्वी आला असावा.कोकण पाठोपाठ पुणे , मुंबई ,नाशिकमध्ये समाजाची मोठी वस्ती आहे. नाशिकमध्ये खुद्द नाशिक शहर आणि येवला ,सिन्नर भागात हा समाज विखुरलेला आहे .तर पुण्यात पूर्वी शिवाजी रोडच्या पूर्वेला शिंपी समाज पसरलेला होता. कसबा पेठ , बुधवार चौक ,तसेच चोळखण आळी ते गाडीखान हा खास भाग शिंपी आळी म्हणून प्रख्यात होता .मोती चौक ते बुधवार चौकात तर शिंपी व्यवसायाची मोठी बाजारपेठ होती. पुण्याच्या बदलत्या स्वरुपात हे सर्व इतिहास जमा झाले असले तरी पुण्यातील शिंपी समाजाची वस्ती कमी झालेली नाही .मुंबईतल्या शिंपी समाजाच्या आगमनाला थेट १५० वर्षे झालीत. सुरुवातीच्या काळात गिरगावात सी पी टंक,सुतार गल्ली , कुंभारगल्ली अशा मध्यवस्तीत राहणारा शिंपी समाज उपनगरात पांगलाय. पण केवळ एवढ्याच प्रांतात शिंपी समाजाची वस्ती आहे असे नाही, तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रांतात या समाजाची वस्ती आहे.विदर्भात नामदेव महाराजांना मानणारा शिंपी समाज हा वैष्णव शिंपी ह्या नावाने ओळखला जातो, तेथे त्यांची बऱ्यापैकी वस्ती आहे.मराठवाडा भागात सुद्धा भरपूर प्रमाणात शिंपी समाज आहे ,तेथे तो प्रामुख्याने मेरु शिंपी ह्या नावाने ओळखला जातो.हा मेरु शिंपी समाज मुळचा आंध्र प्रदेशचा आहे. तो साधारण ८० ते ९० वर्षापूर्वी महाराष्ट्रात येऊन स्थाईक झाला असावा.त्याने महाराष्ट्रालाच आपले मानले असून येथील भाषा , संस्कार , नामदेव महाराज ह्यांना पूर्णतः स्वीकारले आहे.सुप्रसिद्ध लेखिका इरावती कर्वे ह्यांच्या मते महाराष्ट्रात शिंप्याच्या जरी पुष्कळ पोटजाती असल्या तरी त्यात " नामदेव शिंपी " सर्वात श्रेष्ठ समजतात व त्यामुळेच हल्ली सर्व महाराष्ट्रातील शिंपी आपल्याला नामदेव शिंपी म्हणवतात.कारण कुठल्याही समाजात अशा थोर संताचा जन्म झाला असेल तर तो समाज स्वतःला भूषणभूत झाल्याचे समजतो.
महाराष्ट्र व्यतरिक्त संपूर्ण देशातसुद्धा नामदेव महाराजांना मानणारा शिंपी समाज पसरलेला आहे.भारतात ठिकठिकाणी वसलेला शिंपी समाज दर्जी , छीप्पा , रोहिल्ला अशा वेगवेगळ्या नावानी ओळखला जातो. नामदेव महाराजांनी फक्त शिंपी समाजालाच जवळ केले असे नाहीतर समस्त जणांना एकत्र गुंफून टाकले . त्यामुळे गुजरात , उत्तर प्रदेश ,मध्य प्रदेश , ओरिसा , आंध्र ,कर्नाटक ,पंजाब ,जिथे जिथे नामदेवांनी प्रवास केला तेथे तेथे लोक जोडले गेले. मध्य प्रदेशात तर नामदेव आडनावच लावणारी कुटुंबे आहेत. त्यांच्या या भागवत संप्रदायाच्या प्रचारामुळेच अनेक ठिकाणच्या शिंपी समाजानेही त्यांना आपला समाजपुरुष मानला आहे.
आज शिंपी समाज सर्वत्र विखुरलेला आहे, वस्त्र उद्योगाची मुख्य सूत्र आज दुसऱ्या समाजाच्या हातात आहेत. हा बदल प्रामुख्याने इंग्रजी राजवटीनंतर झालेला आहे. त्यापूर्वी व्यावसायिक दृष्टीने पुणं हे शिंपी समाजाचा सर्वात मोठ व महत्वाचा केंद्र होत. शिवाजी महाराज व पेशवाईच्या काळातही राजे सरदार आणि इतर धनिकवर्गाशी या समाजाचे चांगले संबंध होते.त्यांचे कपडे शिवणे हा मुख्य व्यवसायच होता. आपल्या समाजातील कुटुंब इतकी श्रीमंत होती कि ,तत्कालीन सरकारला युद्ध व इतर आपत्तीच्या काळांत कर्ज देण्यातही या समाजाचा मोठा वाट होता . यातील काही कुटुंब तर अत्तराचे दिवे लावण्याइतपत श्रीमंत होती.
शिंपी व्यवसाय पुरुष करत असले तरी , हाताने शिवण-टिपण काम परंपरेने स्त्रीच करत आली आहे.
 त्याचबरोबर घरात सत्ता सुद्धा तिचीच असते. प्रत्येक सणा-समारंभात तिला पुरुषाइतकाच मान असतो. बहुधा स्त्रीला बरोबरीचा मान देण्याच्या पद्धतीमुळेच समाजात हुंडापद्धती रूढ नसावी.इतकेच काय तर लग्नाच्या खर्चाचा सारा भारही कधीच एकट्या वधूपक्षावर टाकला जात नाही. लग्नाचा खर्च वर- वधू पक्ष मिळून अर्धा अर्धा करतात. कुलधर्म कुलाचारात हि मंडळी आवर्जून परंपरेला धरून राहणारी आहेत . ऋतुमानानुसार येणारे सण , व्रत , वैकल्प शिंपीमंडळी पूर्वसुरूंनी आखून दिलेल्या मार्गानुसारच पार पाडतात. त्यातही समाजाचे बहुतेक सारे सण इतर समाजाशी साधर्म्य असणारेच असतात . सण समारंभ आजही हा समाज जुन्याच पद्धतीने साजरा करत असला तरी काही नवीन प्रथा देखील या समाजाने बदलत्या काळाला साक्षी मानून सुरु केल्या आहेत . आता कालौघात या समाजातील अनेकांनी आपल्या बुद्धीच्या भरवशावर जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तुत्व गाजवायला सुरुवात केलीय. सामाजिक व शिक्षण क्षेत्रात समाज अग्रेसर होत चालल्याची चिन्ह हळूहळू दिसून येत आहे,परंतु फक्त शहरी भागात; ग्रामीण भागात आजही तो शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या मागासलेला आहे.हि गोष्ट नाकारता येणार नाही.
बहुजन समाजाप्रमाणे यांचे जन्म , विवाह , मृत्यू संस्कार आहेत . समान आडनावात विवाह होत नाही . मामेबहिणीशी विवाह होतो.परंतु मावस बहिणीशी विवाह होत नाही .लग्न ब्राह्मण पुरोहित लावतो .विधवा पुनर्विवाहाची आणि घटस्फोटाची प्रथा आहे. समाजाची कुलदैवते प्रांतपरत्वे तुळजाभवानी , जेजुरू खंडोबा , पाली, निंबगाव येथील खंडोबा, कोल्हापूर ज्योतिबा ,बेळगाव भागात यल्लमा ,भवानी , बहिरोबा , गिरीचा बालाजी , जनाई, विठोबा,माहुरची रेणुका , ध्रूपथ आणि बिदर येथील नरसिंह देवता इत्यादी आहेत.
समाजातील प्रमुख पोटजाती पुढील प्रमाणे आहेत.
अहिर, भावसार,नागलिक, चतुर, कोकणी, मराठा , नामदेव , रंगारी , पंचम , शेतवाल , श्रावक , जैन, मेरु , वैष्णव इत्यादी. खालील आडनावाची कुटुंबे समाजात प्रामुख्याने आढळतात .
आंबेकर,रेळेकर,अवसरे , बाचल ,  बागडे , बगाडे, बाक्रे , बारटक्के , बसाले, भस्मे ,चोके , कळसकर , कोपर्डे ,करंजकर, करमुसे, खेडेकर , खोले , दिघे , गोरे, निरगुडे, पाडळकर , फुटाणे, लोळगे, हावळ,पोरे, पिसे, पतंगे, सरोदे, सारंगधर , गनचोरे, गुजर, हेंद्रे,हिरवे,जवळकर, क ,लोळगे ',मुळे , महाडिक , मेटे, मांढरे, नेवासकर , नाझरे ,निखळ ,सुकेणकर, मिरजकर ,महिंद्रकर, मुरांजन ,शिंपी, सिन्देकर , सुबंध , सुलाखे , सलाग्रे, टिकारे,टमके , उपरे, उंडाळे ,टाळकुटे , उरणकर , वेल्हाळ, वनारसे आणि इतरही काही आहेत.तसेच मराठवाडा भागात येमवार, केलेवार,संगेवार ,गटलेवार, भरेवार, रायवारआणि नमेलवार अशी असतात.
महाराष्ट्र राज्य दर्शनिका विभाग प्रकाशित भूमी व लोक ह्या पुस्तकात पारंपारिक शिवणकाम करणारी शिंपी समाजाची लोकसंख्या १९११ सालच्या जनगणनेनुसार त्यावेळच्या मुंबई प्रांतात साधारण ५६४५५ एवढी दाखविण्यात आलेली आहे. तसेच ब्रिटीश कालीन इंग्रज अधिकाऱ्यांच्या अभ्यासानुसार, शिंपी समाजाचे रहाणीमान स्वच्छ , नीटनेटके आहे आणि हा समाज प्रामाणिक,कष्टाळू असून व्यावसायिक दृष्टीकोन ठेवतो..
जय नामदेव.. .🚩
माहितीस्तव सादर..
                   अभय भुरेवार.
                    दत्तनगर,नांदेड.. .

PageNavi Results No.

वाचकांची पहिली पसंत ...

Recent

Recent Posts